औरंगंबााद: एमपीएससीची तयारी करणाऱ्या धुळे जिल्हयातील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज औरंगाबाद शहरात घडली आहे. किशोर भटू जाधव (29 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात मित्र-मैत्रिणींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी सकाळी किशोरने आत्महत्या केल्याचे उघड झाले. दरम्यान, आदल्या दिवशी बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास किशोरने आई-वडिलांना फोन केला होता. मला स्पर्धा परीक्षेत कमी गुण मिळाले असून अपयश आल्याची खंत त्याने व्यक्त केली. वडिलांशी बोलताना त्याने ही नाराजी व्यक्त केली नाही. मात्र आईशी बोलताना त्याने निराशा दर्शवली होती. मात्र खचून न जाता अजून प्रयत्न कर, नाही तर घरी ये, अशी समजूत आई-वडिलांनी काढली होती.
चिठ्ठीत लिहिली मित्र-मैत्रिणींची नावे…
महिनाभरापूर्वीच किशोर जाधवच्या खोलीवर दोन नवीन मुले राहण्यासाठी आली होती. बुधवारी रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपले. मात्र सकाळी सहकाऱ्यांना तो खोलीत दिसला नाही. नेहमीप्रमाणे अभ्यासिकेत गेला, असे असे वाटले. मात्र काही वेळात मित्रांना तो खोलीच्या बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती कळताच सहाय्यक आयुक्त विवेक सराफ, निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पाहणीत त्यांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली. त्यात किशोरने काही मित्र मैत्रिणींची नावे लिहिलेली असून आर्थिक व्यवहार व मानसिक त्रास झाल्यासा उल्लेख केला आहे. किशोरच्या अंतिमसंस्कारानंतर त्याचे नातेवाईक यासंबंधीची तक्रार दाखल करण्यात येणार आहेत.