मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर लगेचच मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. सोमय्यांनी केलेले आरोप पूर्पपणे चुकीचे आहेत, असून येत्या दोन आठवड्यांमध्ये सोमय्यांवर कोल्हापूर सत्र न्यायालयात १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
बिनबुडाचे आरोप करणे ही सोमय्यांची सवय आहे. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असे सांगत किरीट सोमय्या यांची सीए पदवी तरी खरी आहे का याबाबत माझ्या मनात शंका असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
हसन मुश्रीफ यांनी यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडले. युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना एका कामात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोटाळा केला आहे. त्या प्रकरणी आपण लवकरच त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहोत, अशी घोषणाही हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
किरीट सोमय्यांचा आरोप काय?
किरीट सोमय्या यांनी सांगितले की, मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँन्ड्रिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे असं त्यांनी सांगितले.