मुंबई : वेतनाअभावी कर्जबाजारी झालेल्या व आत्महत्येची वेळ आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अखेर राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन देता यावं यासाठी सरकारनं ५०० रुपये वितरीत केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर तातडीनं हा निधी महामंडळाला वितरीत करण्यात आला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 500 कोटी रुपये वितरित करण्याचे निर्देश दिले व त्यानुसर तातडीने निधी वितरित करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पगाराअभावी काही दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री इथं एका एसटी चालकानं आत्महत्या केली होती. माझ्या आत्महत्येसाठी एसटी महामंडळाला जबाबदार धरावं, असं त्यानं चिठ्ठीत नमूद केलं होतं. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. कर्मचाऱ्यांनी आगार बंद करून महामंडळाचा निषेध केला होता. विरोधी पक्षांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. सर्व बाजूंनी दबाव आल्यानंतर सरकारनं तातडीनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.