जळगाव : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, माझी ईडीची चौकशी त्यांनी लावली हे मान्य केले आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला कळले तरी की माझी चौकशी का सुरू आहे. पण अशा रितीने त्रास देणे योग्य नाही. जावयाला तरी असा त्रास द्यायला नको होता, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे.
पक्ष बदलला म्हणून तुम्ही कितीही छळ करा, पण मी काही झुकणारा किंवा घाबरणारा माणूस नाही. नाथाभाऊ मजबूत माणूस आहे. ईडी माझ्या मागे लागली म्हणून माझा चेहरा पण पडणारा नाही. ‘चलते रहना’ असा माझा स्वभाव आहे. तुम्ही माझी कितीही बदनामी केली तरी नाथाभाऊ कसा आहे, हे जनतेला ४० वर्षांत माहिती नाही का? महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहतेय आणि जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मनातील भावना व्यक्त केल्यात.
खडसे यांनी पुढे सांगितले की, माझ्या जावयाला राजकारण माहिती नाही. त्यांनी आयुष्यात काही केले नाही. गेली २० वर्षे ब्रिटनमध्ये नोकरी करतोय. पण त्यांना विनाकारण छळले जात आहे. त्यांचा या प्रकरणात व्यवहार फक्त २ कोटींचा आहे. त्यासाठी देशाची सर्वोच्च यंत्रणा ईडी चौकशी करतेय. महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहतेय आणि जनता यांना माफ करणार नाही. योग्य वेळी जनता उत्तर देईल. एखाद्या निरपराध माणसाला त्रास होत असेल तर ते मलाच नाही तर कोणालाही आवडणार नाही, असेही ते म्हणाले.
‘तीन पक्षांचे सरकार असल्याने कामे होत नाहीत. पुढच्या वेळेस राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणा,’ असे वक्तव्यही एकनाथ खडसे यांनी केले. जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलवर एकमत झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी तयार असले पाहिजे असेही खडसे शेवटी म्हणाले. यावेळी खडसेंनी राष्ट्रवादी परिवाराचे कौतुक केले. भाजप सोडल्यानंतर मी चांगल्या लोकांमध्ये आलोय, याचे समाधान आहे, असेही त्यांनी सांगितले.