मुंबईः जुलैमध्ये पावसाने उसंत घेतल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसानं चांगला जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणी रात्रीपासून रिमसीम पाऊस कोसळत आहे. दरम्यान, येत्या ३-४ तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भासह नाशिक आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, रायगड परिसर रायगड आणि मुंबईच्या किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असल्यानं येत्या काही तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे २१ ऑगस्टपर्यंत सर्वदूर पाऊस असेल. यातही तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे.