श्रीरामपूर – पक्षातून जे गेले त्यांच्याबद्दल विचार करण्याची गरज वाटत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लावला. श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्या संकुलातील विविध इमारतींचे उद्घाटन व नामकरण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभेत असताना पक्षातून एकावेळी 60 लोकांपैकी 52 लोक मला सोडून गेले होते. परंतु तरीही मी पुन्हा उभा राहिलो. लोकशाहीत कुणी कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे जे गेले त्याबद्दल आता विचार करण्याची गरज नाही.
राज्यात वाढलेली बेरोजगारी, देशात निर्माण झालेली आर्थिक मंदीची लाट, शेतकर्यांचे विविध प्रश्न दारिद्य्र या मुलभूत प्रश्नांना बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र यावेळी जनता बळी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी निर्माण होत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी कामगार कमी करण्याचे सत्र सुरू केले आहे. परंतु सत्ताधारी सांगतात की, परिस्थिती चांगली आहे.
परंतु बँकींग क्षेत्रातून काही लाख कोटी बाजूला काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार नोकर्यांपाठोपाठ उद्योगही बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. परंतु ही स्थिती भयावह आहे. आर्थिक मंदी संदर्भात वेळ पडल्यास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही श्री. पवार म्हणाले.