नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. ही बैठक जवळपास अडीच तास चालली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की,गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही असं स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या बैठीकत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून वरिष्ठ नेते कमलनाथ हे उपस्थित होते. जवळपास अडीच तास महाराष्ट्रातील एकूण स्थितीवर यावेळी चर्चा करण्यात आली.
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ प्रकरणावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपने जोरदार हल्ला चढवत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे
या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं जयंत पाटील म्हणाले यावरून तरी राष्ट्रवादी अनिल देशमुख यांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचे दिसून येत आहे.















