गौरवकुमार पाटील / अमळनेर
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयकर भरणारे नोकरदार कर्मचारी असूनही चुकीची माहिती महसूल यंत्रणेला देऊन पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या अमळनेर तालुक्यातील १हजार १७१ व्यक्तींना तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिनांक २४ रोजी नोटिसा काढून बजावण्याची प्रक्रिया सुरू असून पाच दिवसात १६ व्यक्तींनी रक्कम परत केली आहे , तर जे आयकर दाते शेतकरी ही रक्कम १५ दिवसात परत करणार नाहीत त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करून रक्कम वसूल केली जाईल असेही नोटीसीत नमूद केले आहे
पीएम किसान योजनेच्या निकषा प्रमाणे आयकर भरणाऱ्या व्यक्ती या योजनेस पात्र नाहीत. केंद्र शासनाने पात्र लाभार्थ्यांपैकी आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. या यादीत संबंधित व्यक्तींचे नाव समाविष्ट असल्याने आपण योजनेत वरील कारणामुळे पात्र असू शकत नाही. म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना- शेतकरी म्हणून मिळालेली रक्कम धनादेशाद्वारे ही रक्कम अमळनेर तहसील कार्यालयात १५ दिवसात जमा कराव्यात अन्यथा १५ दिवसात आपण घेतलेल्या रकमा जमा न केल्यास १९६६ चा जमीन महसूल कायदा व इतर कायद्याअंतर्गत कार्यवाही करून दिलेल्या रकमा वसूल करण्यात येणार आहेत
तालुक्यातील अनुदान कोटींवर
————–
तालुक्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडे लाभ घेतलेले अनुदान कोटींवर असून तालुक्यातील आयकर
भरणाऱ्या १हजार १७१ व्यक्तींनी आतापर्यंत १ कोटी
२० लाख रुपयांचे अनुदान घेतले आहे. यातील सर्व व्यक्तींनी या अनुदानाचे दोन ते सहा हप्ते घेतले आहेत. यामुळे या करदाते व्यक्तींना दोन ते बारा हजार रुपये अनुदान परत द्यावे लागणार आहे.
पैसे परत केले नाहीतर कारवाई
———–
जिल्हा प्रशासनाने कळविलेल्या यादीतील सर्व व्यक्तींना तहसीलदार कार्यालया मार्फत माझ्या सहीने नोटिसा काढण्यात आल्या आहेत, गावागावातील तलाठ्यांनी ९५ टक्के लोकांना बजावली असून जे लोक मिळून आले नाहीत त्याचे कुटुंबातील सदस्यांकडे ही नोटीस देण्यात येणार आहेत , १५ दिवसात रक्कमेचा चेक तहसील कार्यालयात जमा करायचा आहे यातील १६ शेतकऱ्यांनी आजपर्यंत रक्कम जमा केली आहे ,तर याबाबत आज दिनांक २८ रोजी आढावा घेण्यात येणार आहे , ज्यांनी वेळेवर रक्कम जमा केली नाही त्यांचेवर कायदेशीर कारवाई करून रक्कम वसूल केली जाईल मात्र तशी वेळच त्यांनी येऊ देऊ नये— मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार-अमळनेर