आळंदी – नेहमीच पंढरपुरला जात असतो पण प्रसिद्धी करत नाही असे आळंदीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. आळंदीत जोग महाराज पुण्यतिथीनिमित्त शरद पवारांनी शनिवारी उपस्थिती लावली. यावेळी झालेल्या एका सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते. याबरोबरच, आळंदीत कुठल्याही हेतूसाठी आलेलो नाही असेही पवारांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमात बोलताना इंद्रायणी स्वच्छ करणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले. तसेच वारकऱ्यांच्या कल्याणासाठी आश्वासने देताना वारकरी स्वतःसाठी कधी काही मागणी करत नाहीत असेही ते पुढे म्हणाले आहेत.
शरद पवार पुढे म्हणाले, “जे वारकरी आळंदीला जात असतात त्यांना देहूला तुकारामांच्या दर्शनाला जाण्यासाठी वेगळी परवानगी लागत नाही. जे विरोध करतात त्यांना खरा वारकरी संप्रदाय विचार समजला नाही. मी छोट्या गोष्टीकडे लक्ष्य देत नाही. मी माझे काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहीन.”
काय आहे वाद?
उल्लेखनीय बाब म्हणजे, नुकतेच “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हिंदू विरोधी आहेत. ते देवाला मानत नाहीत. त्यामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असे पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढले. पूर्वीचे राज्यकर्ते साधना करणारे देवनिष्ठ, धर्मनिष्ठ, विनम्र होते. आताच्या नास्तिक राज्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन करणे किंवा त्यांचे व्याख्यान ठेवून पांडुरंगाची अवकृपा करुन घेऊ नका.” असे राष्ट्रीय वारकरी परिषदेने या पत्रकात म्हटले होते. एवढेच नव्हे, तर “शरद पवार हे रामायणाची आवश्यकता नाही म्हणतात. मुख्यमंत्री असताना पांडुरंगाच्या महापूजेला गैरहजर राहतात. समर्थ रामदास स्वामींचा एकेरी उल्लेख करतात. देव, संत, व्रत, वारी, हिंदू धर्म यांचा अपमान करणाऱ्या, संत तुकाराम वैकुंठास गेले नाहीत, संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली नाही, असं पुस्तक-लेख लिहिणाऱ्या तथाकथित पुरोगामी संघटनांना त्यांचा सातत्याने पाठिंबा असतो.” असेही सांगण्यात आले होते. त्यावरच पवारांनी हे स्पष्टीकरण दिल्याचे बोलले जात आहे.














