नवी दिल्लीः – पद्मश्री’ पुरस्कारासाठी अदनान सामीच्या नावाची घोषणा झाल्यानंतर वाद सुरू झाला असताना आता या वादात बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी उडी घेतली आहे. मूळचा पाकिस्तानी गायक असलेला अदनान सामीला भारताचे नागरिकत्व आणि ‘पद्मश्री’ जाहीर केला जातो तर मग पाकिस्तानमधील पीडित मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व का दिले जात नाही?, असा सवाल मायावती यांनी केंद्र सरकारला केला आहे. सीएए कायद्याचा मोदी सरकारने पूनर्विचार करावा, असा सल्लाही मायावती यांनी दिला आहे.
बसपा अध्यक्षा मायावती यांनी आज एक ट्विट करून मोदी सरकारवर शरसंधान साधले. मूळचा पाकिस्तानचा गायक असलेल्या अदनान सामीला भाजप सरकारकडून भारताचे नागरिकत्व आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. तर मग पाकिस्तानात अत्याचार सोसलेल्या पाकमधील मुस्लिम नागरिकांना भारताचे नागरिकत्व का दिले जात नाही?, पाकिस्तानी मुस्लिमांना हिंदू, शीख, ईसाई आदी धर्माप्रमाणे भारतात सीएए अंतर्गत नागरिकत्व का दिले जात नाही?, केंद्र सरकारने सीएए कायद्याचा पूनर्विचार करायला हवा, असे मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.














