उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील ; स्व. सुमेरसिंह राणा उर्फ सूरजसिंह राणा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
(विलाससिहं पाटील, मुक्ताईनगर)
काही व्यक्ती जन्माला येतात त्या फक्त आपल्या कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी जगण्यासाठी. त्यांचा हसरा चेहरा, प्रेमळ स्वभाव, लोकांसाठी धावून जाण्याची वृत्ती आणि घराण्याचा अभिमान बनलेलं व्यक्तिमत्त्व अचानक निघून गेलं की, फक्त एक माणूस जात नाही… तर एक युग संपल्याची भावना निर्माण होते. अशीच वेदनादायक भावना आज बोदवड, शिरसाळा आणि संपूर्ण परिसर अनुभवत आहे.

शिरसाळा गावची माती, कष्टाळू संस्कार आणि समाजसेवेची परंपरा लाभलेल्या कडूसिंह पांडुरंग पाटील उर्फ आप्पासाहेब यांच्या परिवारात एक तेजस्वी, रुबाबदार आणि प्रेमळ रत्न जन्माला आले… ते म्हणजे स्व. सुमेरसिंह राणा उर्फ सूरजसिंह राणा.
लहानपणापासूनच घरात संस्कार, शिस्त, प्रेम आणि समाजाशी नाळ जोडलेली होती. आप्पासाहेबांनी आपल्या कष्टाने आणि मोठ्या व्यक्तींच्या सहवासातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली. देशाच्या माजी राष्ट्रपती महामहीम श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या परिवाराशी असलेले संबंध, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि समाजातील प्रतिष्ठा यामुळे हे घराणे सतत लोकांच्या सेवेत राहिले.
मुंबईत नोकरी करताना परिवाराचा सांभाळ, मुलांचे शिक्षण पुण्यात, नंतर बोदवड येथे स्थायिक होऊन समाजकारण आणि राजकारणात सक्रिय सहभाग… हा संघर्षमय पण प्रेरणादायी प्रवास होता. आप्पासाहेब ग्रामपंचायत सदस्य झाले, नंतर नगरसेवक म्हणून लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. घरातील प्रत्येक सदस्य समाजासाठी तत्पर होता.
अशा या घरात वाढलेला सुमेरसिंह म्हणजे सर्वांचा लाडका “सूरज”. नावाप्रमाणेच तेजस्वी, उत्साही आणि हसतमुख. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यानेही समाजकार्याची वाट धरली. तरुणाईत उत्साह, वडिलांना राजकीय व सामाजिक कामात खंबीर साथ, मित्रपरिवारात लोकप्रियता आणि कुटुंबासाठी अपार प्रेम… हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते.
काळ पुढे सरकत गेला. संसार थाटला. दोन गोंडस मुलांचे आगमन झाले. मोठ्या प्रेमाने पहिल्या मुलाचे नाव मिहिर ठेवण्यात आले. घरात आनंदाचे क्षण फुलले. स्वप्नांची बाग उमलत होती. उद्योगधंद्यासाठी पुण्यात स्थलांतर झाले. आयुष्य नव्या उंचीवर जात आहे असे वाटत असतानाच नियतीने क्रूर खेळ खेळला.
जो सूर्य घर उजळवत होता… तोच सूर्य अचानक मावळला.
पुन्हा गावात परतला तो चालत नाही… तर ॲम्ब्युलन्समधून…
घरात प्रवेश केला तो बोलत नाही… तर शांत देहाने…
आणि परिवाराच्या हृदयात कायमचा अंधार सोडून गेला.
या परिवाराने यापूर्वीही दुःखाचे घाव सोसले होते. ममता ताईंच्या संसारावर कोरोनाने आघात केला. जावयाचे निधन झाले. आणि आता सूरजसारखा तरुण, उमदा, हसरा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला. नियतीसमोर हा परिवार पुन्हा एकदा हतबल झाला.
समाजातील सुखदुःखात सदैव धावून जाणारा हा परिवार… 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारा हा परिवार… आज स्वतः दुःखाच्या डोंगराखाली दबला. तेव्हा जाणवतं — दुःख काय असतं, हे ज्याच्यावर येतं त्यालाच कळतं.
जनसागराने दिला निरोप
स्व. सूरजसिंह राणा यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी पहिल्याच दिवशी तब्बल 10 हजारांहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. 13 दिवसांपर्यंत आप्पासाहेबांच्या निवासस्थानी मुंगीसारखी लोकांची रांग लागलेली दिसत होती. हे फक्त लोकप्रियतेचे नव्हे, तर त्यांनी कमावलेल्या प्रेमाचे द्योतक आहे.
मान्यवरांनी व्यक्त केल्या संवेदना
या दुःखद प्रसंगी अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी द्वारदर्शन घेतले व परिवाराचे सांत्वन केले. त्यामध्ये:
* महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज
* मंत्री गिरीश भाऊ महाजन
* श्री रावसाहेब दादा शेखावत व पृथ्वीसिंह शेखावत
* आमदार चंद्रकांत भाऊ पाटील
* एकनाथराव खडसे
* डॉ. जी. एन. पाटील (बापूजी)
* श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यध्यक्ष प्रविणसिहं पाटील
* डॉ. उल्हास दादा पाटील
* अशोक भाऊ कांडेलकर
* नंदू भाऊ महाजन
* रोहिणीताई खडसे
* सौ. ज्योतीताई राठोड (पुणे)
* राजेंद्रजी फडके
* वैशालीताई सूर्यवंशी
* डॉ. केतकीताई पाटील
* हरीश रावळ
* सुनील भाऊ काळे
तसेच भ्रमणध्वनीवरून मंत्री संजय दादा सावकारे, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार राजू मामा भोळे, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
अंतिम सेवेत नात्यांची खरी ओळख
स्व. सूरजसिंह राणा यांच्या शेवटच्या प्रवासात नात्यांचे, आपुलकीचे आणि समाजबंधाचे विलक्षण दर्शन घडले.समन्वय राजपूत समाजाचे विलाससिंह पाटील, तसेच दिलीपसिंह पाटील (नांदगाव) आणि दरबासिंह पाटील यांनी अत्यंत जबाबदारीने व आत्मीयतेने शेवटची सेवा पार पाडली.पुणे ते बोदवड हा संपूर्ण ॲम्ब्युलन्स प्रवास त्यांनी स्वतः सूरजसोबत करत, परिवाराच्या दुःखात खंबीर साथ दिली.दुःखाच्या क्षणी दिलेली ही साथ कुटुंबासाठी आयुष्यभर स्मरणात राहणारी ठरली.रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीचे नाते मोठे असते, याची प्रचिती या सेवेतून सर्वांना आली.
शेवटचा निरोप…
सूरजसिंह गेले… पण त्यांनी मागे ठेवले प्रेम, आपुलकी, हसरे क्षण आणि समाजासाठी जगण्याची प्रेरणा.त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात सदैव जिवंत राहतील.ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चरणी स्थान देवो आणि आप्पासाहेबांच्या संपूर्ण परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
स्व. सुमेरसिंह राणा उर्फ सूरजसिंह राणा
“काही सूर्य मावळतात… पण त्यांचा प्रकाश कायम राहतो.”









