नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वतःला ‘कॉस्मोलॉजी तज्ज्ञ’ आणि भविष्यवेत्ता म्हणवणारा अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, इतरांचे भविष्य सांगणाऱ्या या व्यक्तीला स्वतःचे भविष्यच कळले नाही, अशी चर्चा आता सर्वत्र रंगत आहे.

प्रकरण काय आहे?
नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाणे येथे एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अशोक खरात याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली.
महिलेचा आरोप आहे की, भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आणि भीती दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
‘हनीट्रॅप’चा संशय; 58 व्हिडिओंचा मोठा खुलासा
तपासादरम्यान पोलिसांना खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयातून मोठ्या प्रमाणात धक्कादायक पुरावे मिळाले. ‘ओकस प्रॉपर्टी डीलर अँड डेव्हलपर्स’ या कार्यालयात गुप्त पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.

पोलिसांना एका पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असून, यामध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांना भुरळ घालून, भविष्याची भीती दाखवून किंवा इतर आमिषे देऊन त्यांना जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय आहे.
तपासाची व्याप्ती वाढली
या प्रकरणाचे धागेदोरे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून, ते ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. जप्त व्हिडिओंमध्ये कोणकोण सहभागी आहे, याचा सखोल तपास पोलीस आणि क्राईम ब्रांच करत आहेत.
या प्रकरणामुळे अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोण आहे अशोक खरात?
अशोक खरात हा स्वतःला मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी असल्याचे सांगत होता. सुमारे 22 वर्षे सेवा केल्यानंतर त्याने ‘कॉस्मोलॉजी’ या विषयात प्राविण्य मिळवल्याचा दावा केला.
तो शिवनिका ट्रस्ट चा प्रमुख असून ईशानेश्वर मंदिराचे व्यवस्थापनही पाहत होता.
तसेच, त्याने अनेक राजकीय नेत्यांचे भविष्य सांगितल्याचा दावा केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह काही मोठ्या नेत्यांनी त्याची भेट घेतल्याच्या चर्चेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता.

समाजात संताप आणि भीतीचं वातावरण
या घटनेनंतर समाजात संतापाची लाट उसळली आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आडून महिलांचे शोषण केल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या व्यक्तींपासून सावध राहावे आणि कोणत्याही प्रकारची शंका असल्यास त्वरित तक्रार नोंदवावी.
ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की, आंधळा विश्वास किती धोकादायक ठरू शकतो. आता या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.










