औरंगाबाद – राज्यातील गोरगरीब जनेतेच्या दैनंदीन समस्या अनेक आहेत. गॅस पेटवणं सोपं असतं पण गोरगरीबाच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
औरंगबादमध्ये ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०’चे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘राज्यातील अनेक राजकीय अडचणींवर मात करुन हे सरकार स्थापन झालं आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार असून मला राज्यातील शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करायचं आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘कृषी आणि उद्योग यांचा मिलाफ करुन राज्यात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मंदी आली म्हणून रडत बसलो तर लढू शकणार नाही. महाराष्ट्राला रडण्याची नव्हे, तर लढण्याची परंपरा आहे’, असं उद्धव यांनी सांगितलं. ‘राज्यात अनेक उद्योग येतील, जगाला ‘मेड इन इंडिया’ची भुरळ पडली पाहिजे. जगासमोर महासत्ता होऊ इतकी ताकद भारताकडे आहे. आपल्याकडे जे कौशल्य आहे, जी बुद्धिमत्ता आहे, त्याचा योग्य वापर आपण करू शकलो तर संपूर्ण जगाची बाजारपेठ जिंकू शकू एवढी हिंमत, ताकद आणि कौशल्य भारताकडे आहे, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.