जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव लोकसभा निवडणूक काही दिवसांवर असतांना भाजपाने जाहीर केलेला जळगाव लोकसभेचा उमेदवार बदलण्याच्या चर्चाना उधाण आले असून राजकीय वर्तुळात चर्चा होतांना दिसत आहे. दरम्यान जळगाव लोकसभेचा उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने कसा निवडून आणता येईल यासाठी मंत्री गिरीष महाजन यांनी जळगाव येथील भाजपा जी. एम. फाउंडेशन कार्यालयात प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन काही सूचना देखील केल्या आहेत. भाजपाचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांची देखील काल मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत बंदद्वार चर्चा झाली, चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नसला तरी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
पुन्हा उमेदवारी बदलण्याच्या चर्चाना उधाण
गेल्या लोकसभा निवडणुकीत ऐन वेळेला स्मिता वाघ यांना माघार घेण्याचे पक्षाने सांगितल्याने स्मिता वाघ यांनी पक्षादेश मानला, संयम ठेवला आणि त्याच निष्ठाचे किंमत करत त्यांना पून्हा लोकसभेचे तिकीट जाहीर केले आहे. दरम्यान जळगाव लोकसभेत महाविकास आघाडीने कालच शिवसेना उबाठा पक्षाने भाजपातून बाहेर पडलेल्या करण पवार यांना जळगाव लोकसभेतून उमेदवारी जाहीर केल्याने असून त्यांना विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची खंबीर साथ असल्याने या लोकसभा मतदार संघात भाजपा समोर तगडं आव्हान मानलं जात आहे.राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही असं म्हटलं जातं,अशातच भाजपा गेल्या वर्षाची पुनःवृत्ती करेल पुन्हा जळगाव लोकसभेचा उमेदवार बदलेल अशी चर्चा होऊ लागल्या आहेत, मात्र भाजपा आता उमेदवार बदलणार नाही असं भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
माजी खासदार ए. टी. नाना पाटील सक्रिय
गेल्या निवडणुकीत दोन टर्म राहिलेले खासदार खासदार ए. टी. नाना पाटील यांचे तिकीट कापले त्यानंतर ते भाजपा पासून अंतर राखून होते, पक्षाच्या अनेक महत्वाच्या बैठका, निर्णयात ते सक्रिय नसल्याचे दिसून आले मात्र काल मीडिया प्रतिनिधिंशी बोलतांना ते म्हणाले की मी सक्रिय होतो, पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत होतो, माझंही तिकीट कापलं, पण मी पक्ष सोडून गेलो नाही, मी यावेळीही तिकीट मागितलं होतं मात्र ते दिलं नाही, तरीही पक्ष जो आदेश देईल त्या प्रमाणे काम करेल असं त्यांनी भाजपा कार्यालयात आले असता यावेळी सांगितलं.दरम्यान भजपाच्या केंद्रीय समितीने उमेदवार बदलाच्या हालचाली केल्यास माजी खासदार ए. टी. पाटील रेस मध्ये असल्याचं समजते.
भाजपा आता उमेदवार बदलणार नाही
विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर करून आधीच जळगावात भाजपाने भाकरी फिरवली आहे.गेल्या वेळेस त्यांना ऐन वेळी माघार घ्यायला लावली व उन्मेष पाटील यांना तिकीट दिल्याने पुन्हा स्मिता वाघ यांना माघार घ्यायला लावणे म्हणजे निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होईल अशी प्रत्येकाची भावना आहे. निव्वळ महाविकास आघाडीचा तगडा उमेदवार मैदानात उतरवला म्हणून उमेदवार बदलाचा निर्णय भाजपा घेणार नाही. जळगाव लोकसभा भाजपाचा बालेकिल्ला राहिला असून प्रचंड मताधिक्याने भाजपा आपला उमेदवार येथून निवडून आणतो, मंत्री महाजन देखील मुरलेले राजकारणी असून त्यांनी जळगाव जिल्ह्यातील दोनही जागा निवडून येण्यासाठी पुर्ण फिल्डिंग लावली आहे. त्यामुळं भाजप आता जळगाव लोकसभेचा उमेदवार बदलणार नाही असंच वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.