मुंबई – भाजपने बहुमत सिद्ध करण्यापूर्वी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केल्याची माहिती आहे. भाजपने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवूनच कमळ फुलवलं होतं, त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रातही ही तयारी सुरू झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. याची जबाबदारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेले नेते गणेश नाईक, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि बबनराव पाचपुते यांच्यावर सोपवण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.
भाजपने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवलं आणि मोठ्या घडामोडींनंतर सत्ता स्थापन केली. कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण काँग्रेस आणि जेडीएसने सरकार स्थापन केलं. नाराज असलेल्या 17 आमदारांना भाजपने हाताशी धरलं आणि सूत्र हलवली. कर्नाटकच्या या बंडखोर आमदारांना मुंबईतील रेनिसन्स (जिथे सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत) हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आणि काँग्रेस-जेडीएस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास भाग पाडलं. 17 आमदार गैरहजर असल्यामुळे बहुमताचा आकडा खाली आला आणि भाजपने सहज सत्ता मिळवली.