पुण्यात लेवा पाटीदारांचा परिचय मेळावा
पुणे- (प्रतिनिधी)- लेवा पाटीदार समाजात उपवर वर आणि वधू हे उच्च शिक्षित होत आहेत. ही चांगली बाब आहे. मात्र विवाहानंतर दोन-तीन वर्षांत विवाहविच्छेदाचे प्रकार मोठ्या टक्केवारीत वाढले आहेत. हे वास्तव लक्षात घेऊन विवाहजुळणी करताना कुंडली जुळविण्यापेक्षा उपवर वर वधुंचे स्वभाव अगोदर जुळवा” असे आवाहन लेवा भोर पंचायतचे कुलसचिव तथा जेष्ठ विधीज्ञ ॲड. संजय राणे यांनी केले.
पुणे येथे लेवा भातृ मंडळातर्फे आयोजित उपवर वर वधू परिचय मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. राणे बोलत होते. स्वारगेट येथील गणेश क्रिडा संकुलात हा मेळावा काल झाला. या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ८०० वर युवक-युवती व ३ हजारावर पालक उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन लेवा भातृ मंडळाचे अध्यक्ष रवींद्र चौधरी व सचिव अनिल बोंडे व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते.
मेळाव्यास प्रमुख पाहुणे पुणे जीएसटी ॲडीश्नल कमिश्नर विक्रम वाणी, सौ. पल्लवी वाणी, पलशर बायो प्रॉडक्टचे संचालक निखील चौधरी व ॲड. राणे उपस्थित होते. यावेळी लेवा भातृ मंडळातर्फे पुण्यात उपवर वर वधुंसाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले. त्याचेही उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी केले.
ॲड. संजय राणे हे लेवा भोर पंचायत मार्फत समाजातील विवाह विच्छेद प्रकरणात तडजोडीसाठी प्रयत्न करतात. या अनुभवाचा उल्लेख करीत ॲड. राणे म्हणाले, “विवाह जुळवणी घाईने करण्याचे पालकांनी टाळायला हवे. लग्नानंतर अवघ्या २/३ वर्षांत विवाहविच्छेदाचे प्रकार वाढत आहेत. हे खेदजनक व नव्या समस्या निर्माण करणारे आहे. विवाह जुळवताना उपवर वर वधुचे स्वभाव जुळतात का ? हे मध्यस्थ व पालकांनी पाहावे. दोन्ही कुटुंबाचे विचार, आचार व स्वभाव जाणून घ्यावेत. उच्च शिक्षितांनी वेळप्रसंगी एकमेकांच्या कुटुंबात थांबून स्वभाव, आवड, निवड याची खात्री करावी. तरच विवाह जुळणीसाठी कुंडली पाहावी.”
ॲड. राणे यांच्या आवाहनाला उपस्थित पालकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. श्री. वाणी, श्री. चौधरी यांनीही या संदर्भात उल्लेख करुन लेवा समाजातील विवाह टीकविण्याकडे पालकांनी लक्ष देण्याचे आवाहन केले. मेळाव्याचे आयोजन उत्तम पध्दतीने करण्यात आले होते.














