पुणे – विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले आमदार आणि अपक्ष आमदार असे एकूण १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करतानाच आम्ही कोणतीही मेगा भरती करणार नाही, राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या आमदारांना मेरिटवरच पक्षात प्रवेश दिला जाईल, अस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला आले असता मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला.
भाजपमध्ये गेलेल्या अनेक आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. अपक्ष आमदारही संपर्कात आहेत. त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे. आमचे आमदार आणि कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय आम्ही या आमदारांना प्रवेश देणार नाही. पक्षातील तरुण कार्यकर्त्यांचा हिरमोड होईल, असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं सांगतानाच राष्ट्रवादीत येऊ इच्छिणाऱ्या आमदारांचं नाव उघड करून त्यांना अडचणीत आणून इच्छित नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
जनतेच्या मनातलं आणि स्थिर सरकार देण्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रयत्न आहे. थोडा वेळ जाईल, पण स्थिर आणि मजबूत सरकार लवकरच दिलं जाईल, असं ते म्हणाले. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांच्याविरोधात आम्ही लढलो. ज्यांना विचारानं पराभूत केलं. जे वैचारिकदृष्ट्या भिन्न आहेत. त्या भाजपसोबत आम्ही जाणार नाही, असं सांगतानाच भाजपपेक्षा शिवसेना म्हणजे दगडापेक्षा विट मऊ आहे, असंही ते म्हणाले.
आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत कोणत्याविषयावर चर्चा होणार हे मला माहित नाही. बैठकीला राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावण्यात आले आहे, असं सांगतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. मात्र हा मसुदा अंतिम नाही. तिन्ही पक्षाचे नेते दिल्लीत एकत्रित बैठक करून या मसुद्यावर अंतिम निर्णय घेतील, असं ते म्हणाले. सध्या तिन्ही पक्षाची चर्चा प्राथिमस्तरावर आहे. त्यामुळे घटक पक्षांना चर्चेसाठी बोलावलेलं नाही. जेव्हा विचाराची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा घटक पक्षांना बोलावलं जाईल, असंही ते म्हणाले.