राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या जवळच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे, “शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या जे काही होत आहे, ते निव्वळ दबावाचे तंत्र आहे. निवडणूक होण्यापूर्वीपासून दोन्ही पक्ष एकत्रित आहेत. आणि सत्ता देखील दोघे मिळूनच स्थापित करणार आहेत. राष्ट्रवादीबद्दल बोलावयाचे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आम्ही केवळ ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेऊन सरकार स्थापनेची वाट पाहणार आहोत.”
निवडणुकीच्या वेळी सत्तेचे समान वाटप (मुख्यमंत्री पदावरही) होणार असे आश्वासन भाजपकडून मिळाल्याचा दावा शिवसेनेने केला. परंतु, भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाही. या पदावर पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच राहतील असे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, शिवसेनेचा अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव कितपत यशस्वी होतो हे तुर्तास सांगता येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 288 पैकी 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. तर शिवसेनेकडे 56 जागा आहेत. तरीही शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपला सत्ता स्थापित करता येणार नाही.