
मुंबईः- आयुष्यातल्या पराजयाने खचून जायचे नाही. लढाईसाठी सज्ज झालंच पाहिजे. तळागाळापर्यंत जा, संघटन नव्याने तयार करा, माणसांना जोडा. हवा यावेळी आपल्या बाजूने होती. सत्ताधाऱ्यांना वाटलं होतं आता विरोधक नाही, मुख्यमंत्री खिल्ली उडवत होते मात्र राज्यातील जनतेने त्यांनाच ट्रोल केले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात विधानसभा निवडणुकांमध्ये कडवी झुंज देऊनही ज्यांना यश मिळू शकलं नाही अशा उमेदवारांशी आज संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. भाजपवर टीका करणाऱ्या छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा भाजप व मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. राज्यात भाजची सत्ता होती त्यावेळी त्यांना वाटले की आता विरोधक उरला नाही. त्यामुळे ते विरोधकांची मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली. परंतु, राज्यातील जनतेला हे मान्य नव्हते. राज्यातील मतदारांनी त्यांनाच ट्रोल केले असे भुजबळ म्हणाले.