जालना : केंद्रीय तपास यंत्रणा ईडीनंतर आता आयकर विभागही कारवाईत आहे. बंगालनंतर महाराष्ट्रातही आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये मोठी रोकड सापडली आहे. राज्यातील जालन्यात आयकर विभागाने स्टील, कापड व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपरवर छापे टाकले असून, त्यामध्ये विभागाला मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता सापडली आहे. प्राप्तिकर विभागाने सुमारे 390 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली असून, त्यात 58 कोटी रुपये रोख, 32 किलो सोने, हिरे आणि मोती आणि अनेक मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. वऱ्हाडाच्या गाड्यांमधून येत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. दुल्हन हम ले जाएंगे, अशा स्वरुपाचे स्किकरही गाड्यांवर लावण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
छाप्यात सापडलेली रोकड मोजण्यासाठी विभागाला 13 तास लागले. एक ते आठ ऑगस्ट दरम्यान प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या नाशिक शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत राज्यभरातील 260 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. आयटी कर्मचाऱ्यांची पाच पथकांमध्ये विभागणी करण्यात आली असून छाप्यांमध्ये १२० हून अधिक वाहनांचा वापर करण्यात आला आहे.
कापड व स्टील व्यापाऱ्याच्या घरातून सापडलेली रोकड जालना येथील स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत नेऊन मोजण्यात आली. रोख मोजणी सकाळी 11 वाजता सुरू होऊन रात्री 1 वाजण्याच्या सुमारास संपली. जालन्यातील चार स्टील कंपन्यांच्या व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती, त्यानंतर आयकर विभाग कारवाईत आला. आयटी पथकाने घर आणि कारखान्यांवर छापे टाकले. पथकाला घरात काहीही मिळाले नसले तरी शहराबाहेरील फार्महाऊसवर रोख रक्कम आणि सोने, हिऱ्यांसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली.