मुंबई : मान्सूनने राज्य व्यापल आहे. तरी देखील राज्याच्या इतर भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी केली आहे. मात्र, पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान आज पहाटेपासूनचं मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. येत्या 4 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई ठाण्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या काही भागात सुरुवातील पावसानं चांगली हजेरी लावली होती. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. मात्र, पावसानं पुन्हा दडी मारली आहे.
पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.