मुंबई : राज्यात धडाक्यात दाखल झालेला मान्सून सध्या गायब झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याकडूनही ‘मान्सून आला रे’ अशी भाकितं दिली जात असली तरीही प्रत्यक्षात मात्र पावसाची वाट अडल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे मान्सून पोहोचलेल्या ठिकाणी पावसाच्या सरींनी मात्र दडी मारली आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यात उशीरा दाखल झालेला मान्सून अल्पावधीतच सक्रीय होईल असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता जून महिन्याचा पंधरवाडा उलटलेला आहे. असे असताना राज्यातील काही भागात मान्सूनने पाठ फिरविली आहे. राज्यातील काही ठिकाणी अनिश्चित व अनियमित असलेला पाऊस कुठे बरसतो तर कुठे फिरकतही नाही. मान्सूनच्या या रुपामुळे राज्यात खरिपाच्या पेरण्या तर खोळंबल्या आहेतच पण पावसाचा अंदाजच बांधता येत नसल्याने खरिपावरच चिंतेचे ढग आहेत. आता पाच दिवस मुसळधार पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण यामध्ये राज्यातील विदर्भ वगळता कोणत्याही भागाचा समावेश नाही. त्यामुळे मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रीय केव्हा होणार हा प्रश्न कायम आहे.
कोकणवाशीयांनाच पावसाची प्रतीक्षा ज्या तळकोकणातून राज्यात पाऊस दाखल होत असतो त्याच भागात सध्या चिंतेचे वातावरण आहे. कारण 10 जून रोजी पावसाला सुरवात झाली तेव्हापासून एकही मुसळधार पाऊस झालेला नाही. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि नंतर कडाक्याचे ऊन यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावऱण आहे. पावसाला सुरवात होताना पोषक वातावरण होते पण आता यामध्ये मोठा बदल झाला आहे.
दरम्यान, राज्याच्या राजधानीत पावसाला सुरवात कोकणाबरोबर मुंबईत दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून गायब होता. पण गुरुवारी सकाळपासून मुंबईसह मुंबई उपनगरातील कुर्ला, वांद्रे, खार, कांदिवली, बोरीवली, अंधेरी परिसरात अधूनमधून पाऊस पडत आहे, कुर्ला परिसरातही अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
विदर्भात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्हा मध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी येत असल्या तरी आवश्यक त्या प्रमाणात पावसाचा जोर कायम राहील असे चिन्हं नाहीत. त्यामुळे शेतकरी यांनी आपल्या मसागातीची सुरवात जरी केली असली तरीही मात्र जिल्हा मध्ये आवश्यतेनुसार पाऊस पडला नसल्याने शेतकरी मात्र आज चिंतातूर झाला आहे. आजही शेतकरी पावसाच्या अभावी पेरण्या खोळंबल्या आहे.