नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणखी एक झटका बसला आहे. तो म्हणजे मालिकांनी अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने नवाब मलिकांची ही याचिका फेटाळून लावत सध्या तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणं योग्य नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना हा एक मोठा झटका बसला आहे.
ईडीने आपल्याला केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचं म्हणत नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण आज सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. यावेळी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, तपासाच्या या टप्प्यावर आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही. या टप्प्यावर आम्ही हस्तक्षेप करत नाही. त्याचबरोबर नवाब मलिकच्या तुरुंगातील कोठडीतही ६ मे पर्यंत वाढ झाली आहे.
गेल्या महिन्यात 15 मार्च रोजी मुंबई हायकोर्टाने सुद्धा नवाब मलिकांची ही याचिका फेटाळून लावली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली. यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून केली होती.