औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कदायक घटना समोर घडलीय. औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री दौलताबाद- पोटूळ दरम्यान घडलीय. दरोडेखोरांनी सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवली आणि त्यानंतर रेल्वेत घुसून लुटमार केली. या घटनेनंतर खळबळ उडाली. वीस दिवसांपूर्वी याच ठिकाणी अशीच रेल्वे अडवून प्रवाशांना मारहाण करून लुटण्यात आले होते.
मुंबईहून औरंगाबाद मार्गे नांदेडला निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथून औरंगाबादकडे येत होती. दरम्यान देवगिरी एक्स्प्रेसवर दौलताबाद-पोटूळ दरम्यान येण्यापूर्वी दरोडेखोरांनी सिग्नलवर कपडा बांधून रेल्वे थांबवली. त्यानंतर चार ते पाच दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, तर मोबाइल हिसकावून घेतले. यावेळी रेल्वेवर तुफान दगडफेकही करण्यात आल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तर एकाच महिन्यात दुसरी घटना घडल्याने पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचे आव्हान असणार आहे.