जळगाव : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. त्यांची मुबई आणि अलिबाग येथील संपत्ती ईडीने जप्त केली आहे.या कारवाईनंतर संजय राऊतांनी बेकायदेशीपणे एकही रुपया अथवा जमीन सापडली तर मी भाजपला दान करुन देईन,असं वक्तव्य केलं होते. दरम्यान, यावर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
‘खोट बोल पण नेटाने बोल’ ही म्हण तंतोतंत संजय राऊत यांना लागू पडते. संजय राऊत आरोपांच्या बाबतीत नुसत्याच डरकाळ्या फोडत असतात. ते जे बोलत आहेत ते कुठे सत्य झालं का? नुसत्याच वल्गणा करायच्या, प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढंच काम संजय राऊत यांना येत. या शब्दात गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.
जामनेर येथे आपल्या निवासस्थानी भाजपचे नेते गिरीश महाजन हे पत्रकारांशी बोलत होते. ‘सगळी चौकशी होईल, सगळे पेपर समोर येतील, तेव्हा जनतेसमोर सर्व गोष्टी येतील, त्यामुळे खासदार संजय राऊत हे काहीही बोलत असले तरी त्या गोष्टीला आता अर्थ उरलेला नाही’, असं महाजन म्हणाले.
काही तरी असल्याशिवाय ईडी कारवाई करणार नाही. माझा खून होणार आहे. असं तोंडात येईल ते वाट्टेल ती काहीही बडबड आता संजय राऊत करत आहेत. फाट्यावर मारतो अन् लाठ्यावर मारतो, असं राऊत यांनी म्हटलं तरी आता काहीही होणार नाही. आता संजय राऊत यांना कुठलीही सहानुभूती मिळणार नाही. या ईडीच्या कारवाईच्या निमित्ताने राऊत यांनी केलेले सर्व पाप आणि पुण्य हे जनतेच्या समोर आलेलं आहे. आता थोड थांबा, असं म्हणत गिरीश महाजन यांनी राऊतांना एकप्रकारे इशाराही दिला आहे.