मुंबई : गेल्या काही महिन्यापासून संपावर असलेल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करुन त्यांच्याजागी नवीन कामगार भरती करण्यात येतील, असा थेट इशारा अजित पवार यांनी दिला.
सरकारने विचाराअंती कामगारांना परत कामावर परतण्याची संधी दिली. वेळोवेळी कामावर परतण्यासंबंधी आवाहन केलं. तत्पूर्वी काही कामगार देखील कामावर परतले. पण अजूनही काही कामगार संपावर ठाम आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, की आपण सारासार विचार करुन उद्या कामावर रुजू व्हा, अन्यथा तुमच्यावर बडतर्फीची कारवाई करुन तुमच्याजागी नवी कामगार भरती करण्यात येईल” असे अजित पवार म्हणाले.
राज्य सरकार संपकरी कर्मचाऱ्यांच्या बाबत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं अजित पवार म्हणाले. कठोर निर्णय म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकून त्यांच्याजागी नवीन भरती करणार, अशी घोषणाच अजित पवार यांनी केली. तसंच त्यासंबंधी आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं.