मुंबई : राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी असा गारपिटीचा इशारा देखील वर्तवण्यात आला आहे. जळगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात काल मध्यरात्री पावसाने हजेरी लावली.
हवामान खात्याने राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जाहीर केला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.
तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, उकाड्याने हैराण झालेल्या नाशिकरांना गारवा अनुभवायला मिळत आहे. मात्र, त्याच दरम्यान अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा पीक धोक्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक मध्ये ढगाळ वातावरण सुद्धा आहे.
९ मार्च : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस आणि गारा कोसळतील. विदर्भातही पावसासह विजांचा कडकडाट होईल.
१० आणि ११ मार्च : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
१२ मार्च : राज्यात हवामान कोरडे राहील.