मुंबई – ’कोहिनूर’ प्रकरणातील ईडीच्या चौकशीनंतर फारसे प्रकाशझोतात नसलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणूक ताकदीने लढवण्याची घोषणा केली. 5 ऑक्टोबरला जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये हा मेळावा झाला. राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनसे निवडणुका लढणार असल्याची माहिती दिली. किती आणि कुठल्या जागा लढवणार याबाबत योग्य वेळी घोषणा करण्यात येईल, असे ते म्हणाले. बरेच दिवस मी बोललो नव्हतो. आता सुरुवात केली असून महाराष्ट्राच्या जनतेपुढे सर्वकाही सांगेन, असे राज म्हणाले.
ईव्हीएम विरोधाची भूमिका मी घेतली होती. निवडणूक लढवावी की नाही या विचारात मी होतो. मात्र ईव्हीएमच्या विरोधाबाबत मी अनेक नेत्यांना भेटलो. सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. पण कालांतराने कुणीही ठोसपणे पुढे आले नाही. मी अनेकांशी या विषयावर बोललो, त्यानंतर आपण एकट्यानेच निवडणुकीवर बहिष्कार का टाकावा? असा विचार केला. पक्षात अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहोत. भाजपकडून कुठली ना कुठली चूक होईलच आणि त्यात आपल्याला यश मिळू शकते. माझा आतला आवाज सांगतोय, या वेळेला यश मिळेल. मनसे फक्त निवडणूक लढणार नाही, तर जिंकणार, असेही राज म्हणाले