मुंबई: राज्यावर अद्यापही अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. राज्यातील काही भागात २९ आणि ३० नोव्हेंबरला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केलं आहे.
राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी
हवामान विभागानं सोमवारी 29 नोव्हेंबरसाठी रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे. तर, 30 नोव्हेंबरसाठी ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक आणि अहमदगर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे. तर, सोमवारी यलो अॅलर्ट देण्यात आला नसला तरी ठाणे, मुंबई आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मंगळवारी सोलापूर, औरंगाबाद आणि पालघर जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील तापमान वाढलं, थंडी गायब
अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ झाले आहे. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे पावसाळी स्थिती दूर झाली नाही.