मुंबई : अखेर 15 दिवसांनंतर राज्यातील एसटी कामगारांचं सुरु असलेलं आझाद मैदानावरचं आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा खासदार सदाभाऊ खोत यांनी केलीये. यावेळेस त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकरही होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागात सुरु असलेलं आंदोलन सुरु ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे असही खोत, पडळकर म्हणालेत.
काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी ऐतिहासिक पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच होता. त्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांनी बुधवारची रात्रही आझाद मैदानातच काढली. पण, आज यावर तोडगा अखेर निघालाय.
पगारवाढ हा ऐतिहासिक विजय – सदाभाऊ खोत
“हे जे आंदोलन आहे ते राज्यातील एसटी कामगारांनी सुरु केलं होतं. आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. वेळेत पगार दिला पाहिजे, सातवा वेतन आयोगाप्रमाणं वेतन मिळावं, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. सरकारनं याकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती. सरकार कामगारांकडे लक्ष देत नव्हतं त्यामुळं आम्ही आझाद मैदानावर ठाण मांडून बसलो. 15 दिवसानंतर सरकारला जाग आली. न्यायालयीन लढा वकील लढत आहेत. न्यायालयीन लढा होईपर्यंत सरकारनं तोपर्यंत पगार वाढवून देण्याचा निर्णय घेतला. हा पहिला टप्पा आहे. 17 हजार पगार मिळणाऱ्या कामगारांना 24 हजारांवर गेला आहे. ज्या कामगारांना 23 हजार मिळत होता त्यांना 28 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. ही वाढ मूळ वेतनात होणार आहे. हा कामगारांच्या पहिल्या टप्प्यातील विजय आहे”, असं खोत म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळात बुधवारी झालेल्या बैठकीत विलीनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामध्ये एसटीच्या पहिल्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा परब यांनी केली.
प्रस्तावीत वाढीनंतरचे वेतन
– एक ते १० वर्षे या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, १२ हजार ८० रुपये असणारे मूळ वेतन १७ हजार ८० रुपये झाले आहे. ज्यांचे मूळ वेतन १७ हजार होते, त्यांना आता २४ हजार रुपये वेतन होणार आहे. ही वाढ ४१ टक्के एवढी आहे.
– १० ते २० वर्षे या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात चार हजार रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे, ज्यांचे वेतन १६ हजार होते, त्यांचे वेतन आता २३ हजार ४० रुपये झाला आहे.
– २० वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कामगारांना अडीच हजार रुपयांची वेतन वाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे, ज्यांचे मूळ वेतन २६ हजार रुपये होते आणि त्यांचे स्थूल वेतन ३७ हजार ४४० रुपये होते, त्यांचे पूर्ण वेतन आता ४१ हजार ४० रुपये झाले आहे.
– तर, ज्यांचे मूळ वेतन ३७ हजार होते आणि स्थूल वेतन ५३ हजार २८० रुपये होते, त्यांचे मुळ वेतन आता ३९ हजार ५०० रुपये होईल, तर सुधारित वेतन ५६ हजार ८८० रुपये होईल.