नवी दिल्ली | रिलायन्स जिओच्या २०१६ मधील पदार्पणाने सुरू झालेला स्वस्त दूरसंचार सेवांचा काळ अखेर संपुष्टात आला आहे. भारती एअरटेल या देशातील दुसऱ्या सर्वात माेठ्या दूरसंचार कंपनीने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या भाड्यात २५ टक्के वाढ केली आहे. लवकरच व्हाेडा, आयडिया आणि जिओ देखील भाडेवाढीची घाेषणा करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एअरटेलच्या नुसार नवीन भाड्याचे दर २६ नाेव्हेंबरपासून अंमलात येतील. एअरटेलच्या २८ दिवसांच्या प्रीपेड प्लॅनचा दर सध्या ७९ रुपये असून ताे आता ९९ रुपये हाेईल. तर १४९ रुपयांचा प्लॅन १७९ रुपयांचा हाेईल. एका चांगल्या आणि निरोगी बिझनेस मॉडेलसाठी दर वाढवणे आवश्यक असल्याचे भारती एअरटेलने म्हटले आहे. मात्र त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. हा मुद्दा मान्य करतानाच गुणवत्ता आणि सेवेतील सातत्य राखण्यासाठी ही दरवाढ करणे आवश्यक ठरत असल्याचे भारती एअरटेलतर्फे सांगण्यात आले आहे.
समभागांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक
भाड्यात वाढ केल्याची साेमवारी घाेषणा झाल्यानंतर भारती एअरटेलच्या समभागांनी किमतींनी उसळी मारली. कंपनीचा समभाग ७४९.१५ रुपयांवरून ७५६ रुपयांच्या ५२ अाठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला. बाजार बंद हाेताना त्यात .९० टक्क्यांची वाढ झाली.