जळगाव : भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. एकनाथ खडसे यांनी आपला विधानसभा मतदारसंघ सांभाळावा. कोथळी ग्रामपंचायतीत आपला सरपंच, मुक्ताईनगर पालिकेत नगराध्यक्ष तरी आपला आहे का ? हे जरा तपासून पाहवे, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे घोडामैदान समोर आहे. तेथे उतरा, जनतेत समोर या असे आव्हानही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील भाजपच्या आंदोलनप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आमदार महाजन उत्तर देत होते. भाजपने जिल्हा बँक निवडणुकीतून पळ काढल्याचे वक्तव्य खडसे यांनी केले होते. त्यावर महाजन म्हणाले, निवडणूक जर एकतर्फीच असेल तर मग काय होणार? त्यांनी अधिकाऱ्यांचा गैरवापर केला. त्यांच्यावर दडपण आणून उमेदवारी अर्ज रद्द केले. त्यांचे नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले. याच्या निषेधार्ह जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार टाकलेला होता.
भरलेले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. भाजपने निवडणूक लढवलीच नाही. त्यामुळे एकच पॅनल तेथे होते. विजय झाला किंवा पराजय झाला, हा विषय गौण आहे. भाजप हा घाबरणारा पक्ष नाही. अजून जिल्हा परिषदेचे घोडामैदान समोर आहे. तेथे तुम्ही उतरा, जनतेत समोर या, असे आव्हानही त्यांनी दिले. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी आमच्या उमेदवाराचा खोटा दाखला दिला. ज्या बँकेचे कर्ज काढले नाही, ज्या तालुक्यात ते गेले नाहीत त्यांचा खोटा दाखला दिला. स्वत: बिनविरोध निवडून आले. अधिकाऱ्यांवर दडपण आणून उमेदवारी अर्ज रद्द करताहेत. कशाला पळायच्या गोष्टी करताहेत, त्यांच्यात हिंमत होती तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लढायचे होते. भाजप पराभवाच्या धाकाने पळाले असे म्हणतात. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील परिस्थिती बघावी आणि त्यानंतर विजय, पराजयाबाबत चर्चा करू असेही महाजन यांनी सांगितले.