मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी तसेच बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज बुधवार (20 ऑक्टोबर) रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी एक वाजता www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात येईल, तशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
येथे विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा 22 सप्टेंबर 2021 ते 8 ऑक्टोबर 2021 दरम्यान घेण्यात आली होती. तर बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक 16 सप्टेंबर 2021 ते 12 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घेण्यात आली होती.
सदर परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेत स्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयातील गुणांची गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
त्यासाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इयत्ता दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इयत्ता बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.














