मुंबई- राज्यातील 300 दिव्यांगांच्या कायम विनाअनुदानीत शाळांचा कायम शब्द काढण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढणारे संस्थाचालक आणि शिक्षक आज मंत्रालयात समाजीक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यापैकी आलेल्या दोन शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या दोन्ही शिक्षकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. दोघेही सुरक्षा जाळीत विसावल्याने मोठा अनर्थ टळला. या दोघांपैकी एक जण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील संस्थाचालक आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आपल्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने चाळीसगाव येथील संस्थाचालक हेमंत पाटील आणि शिक्षक अरुण नेतोरे या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनीही सरकारचा निषेध करत मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या मजल्याजवळच सुरक्षेसाठी जाळी लावण्यात आली असून त्या जाळीत दोघेही अडकले. या दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.