मुंबई: सण-उत्सवांच्या काळात मेल-एक्स्प्रेसला वाढलेला प्रतिसाद पाहता रेल्वे स्थानकातील अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ‘ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ‘सह सहा रेल्वे स्थानकांतील फलाट तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ आज, शुक्रवारपासून लागू होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत फलाट तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले होते. दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक झाला आणि फलाट तिकीट देणे बंद करण्यात आले. आता करोना स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे सण-उत्सवांसाठी व अन्य कारणांसाठी नागरिकांचा रेल्वे प्रवास पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून फलाट तिकिटांची मागणी होत असल्याने मध्य रेल्वे मुंबई विभागाने फलाट तिकीट दरात पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल या स्थानकातील फलाट तिकीट वाढवण्यात आले आहे.