मुंबई : बंगालच्या उपसागरात उठलेल्या गुलाब चक्रीवादळाने महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिला आहे. ‘गुलाब’ वादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात बदलले आहे. हे छत्तीसगड आणि ओडिशाच्या दक्षिणेकडील भागात गेले आहे. दरम्यान, आता गुलाब’ पाठोपाठ अरबी समुद्रात ‘शाहिन’ नावाच्या नव्या चक्रीवादळाची निर्मीती होणार असल्याचा हवामान शास्त्र विभागाने म्हटलं आहे. या नव्या चक्रीवादळामुळे ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत कोकण, मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
गुलाब चक्रीवादळाचे रुपांतर बुधवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले. तो पट्टा अरबी समुद्राकडे सरकला असून, त्यापासून आणखी एक नवे शाहिन नावाचे चक्रीवादळ ३० सप्टेंबर रोजी सकाळी तयार होणार आहे.
त्यामुळे पुन्हा कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.हे चक्रीवादळ पुढे १ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानकडे सरकणार आहे.मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रावर पुढचे चार दिवस राहणार आहे.
हवामानाचा अंदाज
३० सप्टेंबर : कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्राच्या किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
१ ऑक्टोबर : मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
२ ऑक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
३ ऑक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.