नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसापासून नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 5 हजारांनी वाढ झाली.
देशात गेल्या २४ तासात २३ हजार ५२९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. २४ तासात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशात २८ हजार ७१८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 37 लाख 39 हजार 980 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 30 लाख 14 हजार 898 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 48 हजार 62 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 77 हजार 20 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 88 कोटी 34 लाख 70 हजार 578 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.