यवतमाळ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागात पावसाने धुमाकूळ घेतला आहे. राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यातही एसटी चालकाचं धाडस प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दहागाव येथील पुलावरून एस टी बस पाण्यात वाहून गेली. या घटनेत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथून नांदेड-नागपूर ही बस जात होती. दहागाव येथे पुलावरुन प्रचंड वेगानं पाणी वाहत असताना चालकानं पुराच्या पाण्यात बस घातली. चालकाच्या या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याची माहिती आहे. एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. गावकऱ्यांच्या मदतीने बस मधील प्रवासी बाहेर काढणे सुरू आहे. आमदार ससाणे देखील मदत कार्याता सहभागी झाले आहेत. तर, रुग्णवाहिकेनं मृतदेह उमरखेडला पाठवण्यात आला आहे.