जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील हिवरा, अग्नावती, मंगरूळ आणि तोंडापूर मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले असल्याची माहिती आज दि. 28 रोजी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्पचे
आज सकाळी 07.30 वा धरणाचे 09 दरवाजे 0.15 मीटरने उघडून 4059 क्युसेक विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.तर वाघूर धरणाचे 10 दरवाजे एक मीटरने तर 10 दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत.मोर मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे 3 सें. मी. उघडण्यात आले आहेत.
जिल्ह्यात अजून पावसाची शक्यता….
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 26 ते 29 सप्टेंबर 2021 या कालावधीत नाशिक विभागातील जळगावसह काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने 27 सप्टेंबर रोजी राज्यातील किनारपट्टीवरील जिल्ह्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून त्यात नाशिक विभागातील जळगाव व धुळे जिल्ह्याचा समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदीकाठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावे. सर्व पुरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.