मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. रविवारी सायंकाळी हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी धडकेल. या चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. २७ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला शनिवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून रविवारी संध्याकाळपर्यंत ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने या संबंधी रेड अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशाच्या आणि आंध्रच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होणार असल्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे काही प्रमाणात पूराची शक्यता असल्याचं तसेच इतर प्रकराच्या नुकसानीचाही इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
चक्रीवादळाचा तडाखा राज्याला देखील बसणार आहे. राज्यात येत्या तीन ते चार दिवसांसाठी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल प्रादेशिक हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आज ‘या’ जिल्ह्यांना इशारा
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजा आणि पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
उद्या जोर वाढण्याची शक्यता
राज्यातील पावसाचा जोर उद्या, सोमवारी अधिक वाढण्याचा अंदाज आहे. पालघरमध्ये सोमवार ते बुधवार या काळात वीजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर मुंबईमध्येही सोमवार, मंगळवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठाण्यातही बुधवारपर्यंत पावसाची उपस्थिती कायम असेल.
मराठवाडा, विदर्भातही बरसणार
औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती येथे सोमवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव येथे मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट आहे. या काळात तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल.
बुधवारी मध्यम सरी
विदर्भात काही ठिकाणी मंगळवारपासून तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बुधवारी पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही बुधवारी मध्यम सरींची शक्यता आहे.