नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 42 हजार 909 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये एकट्या केरळमध्येच 29,836 नवे रुग्ण सापडले असून राज्यात 75 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
24 तासात देशात 380 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत असून आता 3.76 लाखांच्या पार गेली आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची धाकधूक वाढत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
24 तासात देशात 34 हजार 763 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 26 लाख 91 हजार 180 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 23 हजार 405 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 37 हजार 701 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 76 हजार 324 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 63 कोटी 43 लाख 81 हजार 358 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.