NYPAH थेरपी
सुवर्ण जीवन प्रवास… भाग १
लेखिका डॉ.सुवर्णा दिलीप पाटील…
(संकलन -मंत्रालय प्रतिनिधी चेतन महाजन)
योग म्हणजे जोडणे. आपली ताकद ही ब्रह्मांडाच्या ताकदी सोबत जोडणे म्हणजेच योग साध्य करणे होय.
‘जे पिंडी ते ब्रम्हांडी, जे ब्रम्हांडी ते पिंडी’. हे ब्रम्हांड ज्या पंचमहाभूतांपासून बनलेले आहे त्याच पंचमहाभूतांपासून आपण बनलो आहोत.
आयुर्वेदात सांगितले आहे की तीन प्रकारच्या प्रकृती असतात वात, पित्त, आणि कफ. यांचा समतोल म्हणजेच आरोग्य होय. बालपणी कफाचा प्रभाव जास्त असतो. तारुण्यात पित्ताचा आणि वार्धक्यात वाताचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे आजारांचे शरीरात आगमन होते. त्यासाठीच आहार-विहार, स्वभाव यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे आणि हे नियंत्रण साध्य होते योगा मधून.
पतंजलि ऋषींनी योगाची व्याख्या चित्त वृत्ति निरोध अशी केली आहे. म्हणजे योगाभ्यासातून मनावर ताबा मिळविणे.
जेथे स्थिर मन तेथे स्थिर काया.
योगाचा सर्वात प्रथम संदर्भ वेदांमध्ये आला. त्यात योगाबद्दल सांगितले पण त्यात आसने नव्हती. तद्नंतर भगवान श्रीकृष्णांनी योगाबद्दल भगवद्गीतेत सांगितले.
“युक्तहारविहारस्य, युक्तचेष्टस्य कर्मसु|
युक्तस्वप्नावबोधस्य योगाभवति दु:खहार||”
अर्थात ज्याचा आहार, विहार, विचार, रोजची कामे, कर्तव्य इत्यादी योग्य आहेत. त्यालाच दुःख हारक योग लाभदायक आहे.
योग म्हणजे फक्त आसने नव्हे तर ती एक जीवनपद्धती आहे जसे राजयोग, कर्मयोग.
या गतिमान जीवन पद्धतीमध्ये आपण आपले शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्य हरवून बसलो. त्यामुळे बीपी, डायबेटीस, थायरॉईड, डिप्रेशन अशा कितीतरी आजारांना आमंत्रित केले.
परंतु सगळ्या जगाला वरदान ठरणारी अतिप्राचीन जीवन पद्धती म्हणजे योग होय. ही देणगी भारताने जगाला दिलेली आहे.
योगा एकसंधता या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. जसा आपल्या शरीराचा एखादी भाग शरीरापासून विलग केला गेला तर तो भाग जिवंत राहू शकत नाही. त्याच प्रमाणे माणूसही भावना, निसर्ग, आप्तस्वकीय यांच्यापासून जास्त काळ वेगळा आणि आनंदी राहू शकत नाही. म्हणजे हा निसर्ग, जीवन जगण्याची आदर्श पद्धत, आप्तस्वकीयांची सोबत. हे सर्व एकत्र आले तरच माणसाचे जीवन हे आनंदी होते.
कटोपनिषदामध्ये सांगितले आहे की जेव्हा सर्व इंद्रिय ताब्यात असतील, मन स्थिर असेल आणि बुद्धी विचाराधीन असते त्यावेळेस योगाच्या सर्वोच्च बिंदूला आपण पोहोचू शकतो.
प्रत्येकालाच आनंदी आणि निरोगी आयुष्य जगायला आवडते. परंतु तसे होत नाही कारण आपण स्वतःला बऱ्याच जबाबदाऱ्यांमध्ये अडकवून ठेवले आहे. परंतु अष्टभुजेप्रमाणे या जबाबदाऱ्या लिलया पेलत एक निरोगी आयुष्य आपण जगू शकतो आणि तेच या सदरातून आपण सुरु करीत आहोत.
प्रत्येक भागानंतर एक आचरण दिलेले आहे. ते आचरण आपण हा भाग वाचल्यानंतर त्या दिवसापासून सुरू करायचे.
एक महिन्यानंतर झालेला बदल नक्की कळवायचा.
आचरण पहिले—झोपण्यापूर्वी हात पाय तोंड स्वच्छ धुऊनच झोपावे.
रात्री झोपताना दिवसभराची जळमटे फेकून निर्मळ मनाने झोपणे. झोपताना मधुर संगीत ऐकावे.
क्रमशः
साहित्यसंपदा
सुवर्णजीवनप्रवास
डॉ.सुवर्णा पाटील,भडगाव















