सांगली । नवदाम्पत्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळावीमध्ये घडली. राज संजय जाधव (वय 23 वर्षे) आणि ऋतुजा राज जाधव (वय 20 वर्षे) असं मृत दाम्पत्याचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत तासगाव पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
मृत राज आणि ऋतुजा यांचा विवाह सुमारे 11 महिन्यांपूर्वी झाला होता. राज जाधव हे बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय आणि द्राक्षबाग शेती करत होते. राज यांचे बीएससीपर्यंतचे शिक्षण झाले असून ते नोकरीच्या शोधात होते. सध्या ते स्वतःची शेती करत होते तर त्यांच्या पत्नी गृहिणी म्हणूनच काम करत होत्या. राज, त्यांच्या पत्नी ऋतुजा राज यांचे आई-वडील आणि लहान भाऊ असे एकत्रितपणे राहत होते.
हे पण वाचा..
अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला, तारीखही झाली फिक्स?
कॉलेजला जाते म्हणून घरातून बाहेर गेली, नंतर विहिरीत घेतली उडी ; मुलीच्या आत्महत्येने कुटुंबीय हादरले
मोठेपण भोवला! नोटांच्या बंडलसोबत कुटुंबीयांचा सेल्फी काढून व्हायरल केला अन् मग….
सरकारची मोठी घोषणा! १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक गावात पोहोचणार ही सुविधा, काय आहे घ्या जाणून..
जाधव कुटुंबियांनी बुधवारी (28 जून) रात्री एकत्रित जेवण केल्यानंतर राज आणि ऋतुजा हे दाम्पत्य आपल्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले. रात्री दीडच्या सुमारास राज यांच्या बेडरुममधून उलट्या होत असलेला आवाज राज यांच्या वडिलांना ऐकू येऊ लागला. त्यामुळे वडिलांनी त्यांच्या बेडरुमकडे धाव घेतली. बेडरुमचा दरवाजा उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला असता त्यांना राज आणि ऋतुजा हे कोणतंतरी विषारी औषध प्राशन करुन बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले.
कुटुंबियांनी तातडीने या दोघांनाही खाजगी वाहनातून तासगांवातील डॉ. जाधव हॉस्पिटल इथे उपचारासाठी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तासगांव ग्रामीण रुग्णालय इथे नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तातडीने या दोघांनाही ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी ते दोघे मृत झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच तासगांव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. तासगाव पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.

