जळगाव दि. प्रतिनिधी
देशाची तरुणाई मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनतेकडे वळत असून, ही समाजासह देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत गंभीर धोक्याची घंटा आहे. तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सामाजिक प्रबोधन, विधायक उपक्रम आणि सातत्यपूर्ण जनजागृतीची गरज आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या प्रश्नाकडे सामाजिक जबाबदारी म्हणून पाहावे, असे आवाहन राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्वची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी जळगाव येथील ब्राह्मण सभेत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीत पक्षाची आगामी रणनीती, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, युवा संघटन, मतदारांशी संपर्क, देशासमोरील सामाजिक आव्हाने तसेच आगामी जिल्हा बँक व दूध संघ निवडणुकांच्या तयारीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सोशल मीडिया हे भविष्यातील प्रभावी शस्त्र
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आज राज्यात आणि देशात घडणाऱ्या राजकीय-सामाजिक घडामोडी आपण पाहत आहोत. एखादा मुद्दा किंवा घटना अचानक मोठी करून जनतेसमोर आणली जाते. त्यामुळे भविष्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे महत्त्व आणखी वाढणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा अभ्यासपूर्ण, संयमी आणि प्रभावी वापर करून केंद्र व राज्य सरकारची विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावीत.
तरुण पिढीला प्रोत्साहित करून राष्ट्रहिताच्या विधायक कार्याशी जोडणे आवश्यक आहे. शहरी नक्षलवाद, धर्मांतर, अपप्रचार आणि समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या शक्तींविषयी नागरिकांना जागरूक करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारावी. लोकसभा निवडणुकीपूर्वी काही शक्तींनी अत्यंत नियोजनपूर्वक कटकारस्थान रचून संविधान बदलले जाणार असल्याचा खोटा प्रचार केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातूनही जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला आणि सोशल मीडियाचा वापर करून संविधानाबाबत अपप्रचार करण्यात आला, असा आरोप महाजन यांनी केला.
उत्सवांच्या माध्यमातून तरुणांना जोडले
आपल्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा उल्लेख करताना गिरीश महाजन म्हणाले की, सुरुवातीच्या काळात आपण तरुणांना एकत्र केले. गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवकांना विधायक कार्याशी जोडले. जनतेमध्ये राहून, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करून संघटना वाढवली. आजच्या कार्यकर्त्यांनीही समाजातील प्रत्येक घटकाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करावे.
उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर निशाणा साधताना महाजन यांनी जंतरमंतरवरील एका प्रसंगाचा दाखला दिला. भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाहीला स्थान नसल्याचे सांगताना ते म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबातील कोणीही आज कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवारातीलही कोणी राजकारणात सक्रिय नाही. भाजपामध्ये कार्य, कर्तृत्व, त्याग आणि जनसेवेलाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते.
धर्मांतराच्या धोक्याकडे लक्ष वेधले
“जगाच्या पाठीवर भारत ही आपली एकमेव मातृभूमी आहे. या देशाची संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. देशात धर्मांतराचे संकट वाढत असून, त्याबाबत समाजाने जागरूक राहण्याची गरज आहे,” असेही महाजन म्हणाले.
विशेषतः तरुणाईतील वाढत्या व्यसनाधीनतेवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. अमली पदार्थ, मद्य आणि इतर व्यसनांमुळे युवकांचे आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि भविष्य उद्ध्वस्त होत आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम, सुदृढ आणि संस्कारित युवा पिढी आवश्यक आहे. त्यामुळे पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यसनमुक्ती अभियान आणि सामाजिक उपक्रमांद्वारे तरुणांना सकारात्मक दिशा द्यावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँक आणि दूध संघाची निवडणूक ताकदीने लढणार
आगामी काळात कोणतीही निवडणूक आली, तरी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सज्ज राहावे. जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक परिस्थिती मजबूत आणि अनुकूल आहे. मात्र आत्मसंतुष्ट न राहता प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी बूथपासून जिल्हास्तरापर्यंत पूर्ण क्षमतेने कामाला लागावे, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघाच्या निवडणुकाही भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढणार आहे. सहकार क्षेत्रात स्वतःलाच सर्वेसर्वा समजणाऱ्या आणि “मी म्हणजेच सर्व काही” अशी भूमिका घेणाऱ्यांना या निवडणुकांमध्ये जनता आणि कार्यकर्ते योग्य धडा शिकवतील, असा इशाराही मंत्री महाजन यांनी दिला.
“५६ वर्षांचा तरुण फक्त ‘मी लढणार’ म्हणतो; गिरीश भाऊ प्रत्यक्ष मैदानात लढतात” संजय सावकारे
मंत्री संजय सावकारे यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांचे नाव न घेता जोरदार राजकीय टोलेबाजी केली. ते म्हणाले, “५६ वर्षांचा एक तरुण सातत्याने ‘मैं लडूंगा, मैं लडूंगा’ असे सांगत फिरतो; मात्र आमचे गिरीश भाऊ साठ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असूनही त्या तथाकथित तरुणापेक्षा कितीतरी अधिक ऊर्जेने आणि जोमाने जनतेसाठी प्रत्यक्ष मैदानात लढत आहेत. समाजाला आणि पक्षाला गिरीश भाऊंसारख्या अहोरात्र काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.”
गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सावकारे म्हणाले की, संकट कोणतेही असो, गिरीश भाऊ सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचतात. निवडणूक असो, आपत्ती असो, संघटनेचा प्रश्न असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्याची अडचण असो, ते पूर्ण क्षमतेने मैदानात उतरतात. त्यामुळे त्यांचे नेतृत्व हे केवळ भाषण करणारे नसून प्रत्यक्ष कृती करणारे नेतृत्व आहे.
भारताच्या इतिहासाचा उल्लेख करताना सावकारे म्हणाले की, या देशावर वेगवेगळ्या कालखंडांत शक, हूण, तुर्क, मुघल, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजांनी आक्रमणे केली; मात्र भारताची संस्कृती आणि राष्ट्रभावना कधीही संपुष्टात आली नाही. “भारताचे नेतृत्व भारताच्या मातीशी नाळ जोडलेल्या नेतृत्वानेच केले पाहिजे; इटलीतून आलेल्यांनी या देशावर राज्य करण्याचे स्वप्न पाहू नये,” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली.
अपप्रचाराला विकासगाथेतून उत्तर द्या चंद्रकांत बाविस्कर
बैठकीचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी प्रास्ताविकातून संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला केवळ प्रतिक्रियेतून नव्हे, तर केंद्र व राज्य सरकारच्या विकासगाथेचे प्रभावी कथन करून उत्तर द्यावे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, सरकारच्या योजना आणि विकासकामांची सत्य माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत दोन महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. पहिल्या ठरावाद्वारे “युवाशक्तीला संधी आणि विकसित भारताचा संकल्प” या भूमिकेचे अभिनंदन करण्यात आले. दुसऱ्या ठरावात विरोधकांच्या अपप्रचाराला सरकारच्या विकासगाथेच्या प्रभावी कथनातून ठोस उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, मंत्री संजय सावकारे, आमदार नंदकिशोर (नंदू) महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, माजी आमदार अरुण पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, डॉ. उल्हास पाटील, डॉ. राजेंद्र फडके, केतकी पाटील, गोविंदशेठ अग्रवाल, राकेश पाटील, श्री. झालटे, मधुकर राणे, नगराध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री सुरेश धनके यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










