साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. या निमित्ताने दि. १ रोजी बालमेळावा होत आहे. या बाल संमेलनाचा विद्यार्थ्यांना आनंद लुटता यावा, यासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी द्यावी, अशी मागणी, मराठी वाङ्मय मंडळातर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांच्याकडे करण्यात आली आहे.
“कलानंद बालमेळावा” समिती प्रमुख संदीप घोरपडे, भैय्यासाहेब मगर, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, बन्सिलाल भागवत, गणेश ठाकरे, भागवत सुर्यवंशी यांनी श्री.अंकित यांची भेट घेवून चर्चा केली. १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बालसाहित्य संमेलनात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्यात मराठी मातृभाषे विषयी प्रेम, सदभाव निर्माण होईल व ते मातृभाषा संवर्धनासाठी प्रेरित होतील.
या करिता जळगांव जिल्हातील सर्व शिक्षण संस्था, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळांना साहित्य संमेलनाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ होणेसाठी व त्यांनी साहित्य संमेलनाच्या स्थळी भेट देण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे. तसेच “कलानंद बालमेळावा” या कार्यक्रमाला सहभागी होणसाठी अमळनेर तालुक्यातील सर्व शाळांना दि.१ रोजी शासकीय सुटी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.