जळगाव,(प्रतिनिधी)- आदिवासी समाजाची अधिक लोकसंख्या असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील 20 गावात केंद्र सरकारच्या माध्यमातून मूलभूत व पाया सुविधा, रस्ते, दूरसंचार सुविधा, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे, मुबलक पिण्याच्या पाण्याची सुविधा, गटारी व मल व्यवस्थापन यावर अधिक प्रकर्षाने कामे करुन या गावांचा वस्तींचा आदर्श गावात रुपांतर होण्यासाठी व गावाचे आरोग्य शिक्षण दळणवळण आदिवासींची उपजीविका यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
केंद्र सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील 20 गावांचा समावेश झाला असून प्रत्येक गावात 20 लाखांचा विशेष निधीच्या माध्यमातून या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज दिली आहे.
केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आदिवासी आदर्श ग्राम विकास योजना नुकतीच घोषित करण्यात आली होती. या योजनेत जळगाव लोकसभा मतदारसंघातील वीस गावांचा समावेश झाला असल्याने आदिवासी बांधवांच्या विकासासाठी मोठी चालना मिळणार आहे.
“ या योजनेत विस गावांचा समावेश”
जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील सुजदे,भोलाणे, कानसवाडे, फूफणी, पिलखेडा, घार्डी, रिधुर, विदगाव, भोकर, देवगाव, धामणगाव अमळनेर तालुक्यातील नालखेडा, पिंपळे बुद्रुक, बोदर्डे, चाळीसगाव तालुक्यातील दसेगाव भवाळी बुद्रुक
पाचोरा तालुक्यातील दिघी एरंडोल तालुक्यातील खेडीखुर्द नंदखुर्द बुद्रुक धरणगाव तालुक्यातील चोरगाव या गावांचा समावेश करण्यात आला असून या गावांमध्ये सुमारे वीस लाखांपेक्षा अधिक निधी खर्च होऊन या गावांमधील शिक्षण आरोग्य सेवा दळणवळण पायाभूत सुविधा उपजीविका साधनांसाठी असलेली कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने दिले असून लवकरच या गावांचा शासनाकडून विकास केला जाणार आहे.
गावांच्या गरजा, क्षमता आकांक्षा लक्षात घेऊन केंद्र सरकारने या गावांच्या एकात्मिक, सामाजिक व आर्थिक विकास साधण्यासाठी प्रधानमंत्री आदिवासी आदर्श ग्राम विकास योजनाच्या माध्यमातून या गावांना विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी या विस गावांचा समावेश करण्यात आला असल्याचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.