जळगाव । राज्यभर गाजलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर याला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सुप्रीम कोर्टाने सुनील झंवर याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. सुनिल झंवर याला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.
काय आहे नेमकं प्रकरण?
बीएचआर म्हणजे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्था. या पतसंस्थेत कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा समोर आला होता. या पतसंस्थेच्या ७ राज्यांमध्ये २६४ शाखा आहे. या पतसंस्थेत २८ हजार खातेदारांचे ११०० कोटी रुपये ठेवींमध्ये अडकून पडले आहेत. मुदत संपल्यानंतरही ठेवींची रक्कम परत न मिळाल्याने हा घोटाळा २०१५ मध्ये उघड झाला होता. त्यावेळी संस्थेच्या १३ संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या घोटाळ्यात संगनमत करून स्वस्तात मालमत्ता घेणं, कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी सुनिल झंवर याला गेल्या वर्षी अटक करण्यात आली. तो गेल्या १० ऑगस्टपासून पुण्याच्या येरवडा तुरुंगात आहे. शिक्रापूर आणि पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांत यापूर्वीच झंवरला जामीन मिळाला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. एकाच गुन्ह्यात २ ठिकाणी जामीन आणि एका ठिकाणी जामीन का नाही? असा युक्तिवाद सुनिल झंवरच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात केला. हा युक्तिवाद सुप्रीम कोर्टाने मान्य केला आणि झंवरला जामीन मंजूर केला.