जळगाव : मार्च महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.
‘चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वन-वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच ते अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत, अशी टीका खडसे यांनी केली.
‘वाईनबाबत एक विरोध करतोय तर दुसरे स्वागत करत आहे. वाईन ही दारू आहे त्यामुळे अण्णा हजारे यांनी यासाठी विरोध केला आहे. मध्यप्रदेशमध्ये मॉलमध्ये बिअर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली. आंध्रप्रदेशमध्ये भाजपला निवडून दिलं तर दारूही गरिबांच्या हिताची असल्याने पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ असे वक्तव्य येथील प्रदेश अध्यक्षांनी केले आहे. त्यामुळे वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.
‘मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी ‘बच्चू कडू हे वरच्या न्यायालयात दाद मागणार असून वरच्या न्यायालयात काय निर्णय लागतो याची वाट पाहिली पाहिजे’ अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांची एकनाथ खडसे यांनी पाठराखण केली आहे.