चाळीसगाव प्रतिनिधी | सलग तिसऱ्या वर्षी गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. मागील काही दिवसापासून गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा येत होता. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी गिरणा धरणाने आज सकाळी सात वाजता शंभरी गाठली. धरणाचे आज सकाळी ४ दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून ७००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गिरणा धरणात रात्रीतुन 6 टक्के पाण्याचा साठा वाढला. सात वाजता सुरवातीला चार गेट एका फुटाने वर करण्यात आले. यातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होत होता. त्यामुळे गिरणा नदीत पाण्याचा मोठा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अग्रवाल, उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस.आर.पाटील यांनी केले आहे.
यंदा गिरणा धरण भरेल की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र ऑगस्ट महिन्यातील जोरदार पावसामुळे धरणातील जलसाठा वाढला. यातच गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला. यातच ठेंगोडा, चणकापूर, हरणबारी, केळझर व पुनद आदी धरणांमधूनही गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा आला.
गिरणा धरण पूर्ण भरण्याची यंदा हॅटट्रीक झाली आहे. तर, धरण बांधल्यापासून ते फुल्ल भरल्याची यंदाची अकरावी वेळ आहे. अर्थात हे धरण पहिल्यांदाच लागोपाठ तिसर्या वर्षी पूर्ण भरले आहे. यामुळे यावर अवलंबून असणार्या नागरिकांसह शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.