मुक्ताईनगर प्रतिनिधी | कोरोना काळात भजन, कीर्तन बंद असल्यामुळे राज्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक अशा जवळपास ४८ हजार कलावंतांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले होते. मात्र त्यांना आता सरकारमार्फत दरमहा मानधन मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
अडचणीत अडलेल्या कीर्तनकार, टाळकरी यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी ६ मे रोजी शासनाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इमेलाद्वारे मागणीचे निवेदनही पाठवले हाेते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून या कलावंतांना महिन्याला ५ हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांना आर्थिक मदत देण्याचा शासनाचा निर्णय निश्चितच दिलासादायक असल्याचे यावेळी खडसे सेवलकर यांनी सांगितले.